श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात आज, शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा जवानांनी लश्कर-ए-तोयबाचा (एलईटी) टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. दरम्यान या चकमकीत सुरक्षा दलाचे २ जवान जखमी झाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. बांदीपोरा जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळी भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली. दहशतवाद्यांच्या हालचालीबाबत मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या बांदीपोरा येथील कुलनार अजस परिसरात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. येथे चकमक सुरु आहे, अशी माहिती भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांना बांदीपोरा येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनची माहिती देण्यात आली. ते येथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवरील (एलओसी) अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.