नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ते आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे. या चित्राने संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनांनी भरला आहे आणि तो तिरंग्यात रंगवला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘मन की बात’च्या १२२ व्या भागातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. मोदी पुढे म्हणाले की, आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आणि दृढनिश्चयी आहे. आज प्रत्येक भारतीयाचा हा संकल्प आहे, आपल्याला दहशतवाद संपवायचा आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या सैन्याने दाखवलेल्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आपल्या सैन्याने सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे अड्डे ज्या अचूकतेने उद्ध्वस्त केले ते आश्चर्यकारक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ने जगभरातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नवा आत्मविश्वास आणि उत्साह दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चा देशातील लोकांवर इतका प्रभाव पडला आहे की, अनेक कुटुंबांनी ते त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. बिहारमधील कटिहार, उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि इतर अनेक शहरांमध्ये त्या काळात जन्मलेल्या मुलांचे नाव ‘सिंदूर’ असे ठेवण्यात आले. सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरबद्दल कविता लिहिल्या जात होत्या आणि संकल्पगीते गायली जात होती. लहान मुले अशी चित्रे काढत होती ज्यात मोठे संदेश लपलेले होते. देशातील अनेक शहरे, गावे आणि लहान शहरांमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आल्या. अनेक शहरांमध्ये, नागरी संरक्षण स्वयंसेवक बनण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण एकत्र आले आणि चंदीगडमधील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिले.
पंतप्रधान म्हणाले की, मी तुम्हाला अशा गावाबद्दल सांगू इच्छितो जिथे पहिल्यांदाच बस आली. तिथले लोक वर्षानुवर्षे या दिवसाची वाट पाहत होते. जेव्हा बस पहिल्यांदाच गावात पोहोचली तेव्हा लोकांनी ढोल वाजवून तिचे स्वागत केले. बस पाहून लोक खूप आनंदित झाले. गावात एक पक्का रस्ता होता, लोकांना त्याची गरज होती, पण इथे यापूर्वी कधीही बस धावली नव्हती. कारण हे गाव माओवादी हिंसाचाराने प्रभावित झाले होते. हे ठिकाण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि या गावाचे नाव काटेझारी आहे. आता येथील परिस्थिती झपाट्याने सामान्य होत आहे. माओवादाच्या विरोधात सामूहिक लढाईमुळे आता अशा भागातही मूलभूत सुविधा पोहोचू लागल्या आहेत. गावातील लोक म्हणतात की बस आल्याने त्यांचे जीवन खूप सोपे होईल.
पंतप्रधान म्हणाले की, छत्तीसगडमधील बस्तरच्या मुलांना विज्ञानाची आवड आहे. ते खेळातही चमत्कार करत आहेत. अशा प्रयत्नांवरून या भागात राहणारे लोक किती धाडसी आहेत हे दिसून येते. या लोकांनी सर्व आव्हानांमध्ये आपले जीवन सुधारण्याचा मार्ग निवडला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत दंतेवाडा जिल्ह्याचा निकाल उत्कृष्ट लागला आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. सुमारे ९५% गुणांसह, हा जिल्हा दहावीच्या निकालात अव्वल राहिला. तर बारावीच्या परीक्षेत या जिल्ह्याने छत्तीसगडमध्ये सहावे स्थान पटकावले. कल्पना करा, दंतेवाडामध्ये जिथे माओवाद एकेकाळी शिखरावर होता, आज शिक्षणाचा झेंडा उंच फडकत आहे. असे बदल आपल्या सर्वांना अभिमानाने भरून टाकतात, असेही ते म्हणाले.