नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शैलेश जोगळेकरांच्या कुटूंबात कॅन्सरमुळे दुःख आले होते. मात्र वैयक्तीक दुःखाला आणि वेदनेला त्यांनी सार्वजनिक सेवेत परावर्तीत केल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले, नागपुरातील “नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट” मध्ये “स्वस्ति निवास पंथागार” या कॅन्सर पीडित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच्या निवासगृहाचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात शहा बोलत होते.
याप्रसंगी फडणवीसांचे कौतुक करताना शहा म्हणाले की नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून फडणवीसांनी त्यांच्या वडिलांच्या कॅन्सर आजाराने मृत्यूनंतर नागपूरसह मध्य भारतातील कॅन्सर रुग्णांसाठी एक चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्याचा स्वप्न पाहिले होते. २०१२ पासून टप्प्याटप्प्याने कॅन्सर रुग्णालयाचं स्वप्न पूर्ण होत गेलं आणि एप्रिल २०२३ पासून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपुरात पूर्ण क्षमतेने कार्यरत झालंय. यासोबतच अमित शाह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा बनले आहे, मात्र जेव्हा फडणवीस यांनी कॅन्सर इन्स्टिट्यूटचं काम सुरू केले, तेव्हा ते काहीच नव्हते. तरी त्यांनी सुरुवात केली.
अशा सेवा कार्यांना देवाचा आणि समाजाचा आशीर्वाद मिळतो आणि म्हणूनच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा वटवृक्ष इथे उभा आहे आणि हजारो गरजूंच्या जीवनातून दुःख दूर करत आहे. पश्चिमी देशात जेव्हा रुग्ण आजारी पडतात, तेव्हा त्याला रुग्णालयाच्या भरवशावर सोडून दिलं जातं. मात्र आपल्याकडे जेव्हा कुटुंबातील एक व्यक्ती आजारी पडतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब त्याच्या सेवेमध्ये योगदान देत असतं. या स्वस्ति निवासच्या माध्यमातून भारतातील सर्व रुग्णालयांसाठी एक नवा आदर्श देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे टीमने समोर ठेवला आहे. या स्वस्तिनिवासच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांची संवेदना कायम ठेवण्याचा काम करेल. असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.