भुवनेशवर : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) भुवनेश्वरमधील अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना २० लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.रघुवंशी हे भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) २०१३ बॅचचे अधिकारी आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकारी रघुवंशी यांनी भुवनेश्वरमधील एका खाण व्यावसायिकाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणातून नाव वगळण्यासाठी एकूण ५० लाख रूपयांची मागणी केली होती. व्यावसायिक राऊत यांनी या लाचेबाबत सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.त्यानुसार, सापळा रचून सीबीआयने २० लाखांची पहिली रक्कम स्वीकारताना अधिकारी रघुवंशी यांना त्यांच्या कार्यालयात अटक केली.
यावेळी सापळ्यात वापरण्यात आलेली रक्कमही जप्त करण्यात आली आहे. तसेच सीबीआयने रघुवंशी यांच्या घरी आणि आयआरसी व्हिलेजमधील कार्यालयावर छापे टाकून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. सीबीआयच्या एफआयआरनुसार, मार्च महिन्यात राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तिथे रघुवंशी यांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि ‘सवलत मिळवण्यासाठी’ भगती नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर भगती सतत राऊत यांच्याशी संपर्कात राहिला होता. तो दबाव टाकत पैसे देण्यास भाग पाडत होता. २७ मे रोजी भगतीने पुन्हा एकदा राऊत यांची भेट घेतली आणि सांगितले की, रघुवंशी ५ कोटी रूपयांची मागणी करत आहेत. या पैशांसाठी त्यांचे हॉस्पिटल जप्त न करणे, अटक न करणे आणि प्रकरण मिटवून टाकण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
राऊत यांनी इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर रघुवंशी यांनी रक्कम २ कोटींवर आणली.पण नंतर ५० लाख रुपयांमध्ये तडजोड झाली. आणि तक्रारदाराने याबाबत सीबीआयला माहिती दिली. त्यानंतर सापळा रचून रघुवंशी यांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सीबीआयने या प्रकरणात सखोल तपास सुरू केला असून, संबंधित आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आणखी कोणी अधिकारी किंवा दलाल सामील आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. चिंतन रघुवंशी हे २०१३ बॅचचे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी असून गेल्या दीड वर्षांपासून ईडीच्या भुवनेश्वर विभागीय कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.