बंगळूरू : बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममधील आरसीबी टीमच्या सत्कार सोहळ्याला प्रचंड गर्दी जमल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयाला गालबोट लागले. या घटनेवरून सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात आरसीबी टीम फ्रेंचायसीकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
आरसीबी टीम फ्रेंचायसीने या दुर्घटनेत मृत झालेल्या लोकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे. त्याशिवाय या घटनेतील जखमींना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आरसीबी केयर्स नावाने एक फंड तयार करणार असल्याचे सांगितले. आरसीबी टीम फ्रेंचायसीने निवेदन जारी करत म्हटलं की, बंगळुरूत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आरसीबी कुटुंबाला खूप वेदना झाल्या आहेत. चाहत्यांचा आदर आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून ११ मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. सोबतच या घटनेतील जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केयर्स नावाचा फंड तयार केला जात आहे. आमचे चाहते कायम आमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी राहतील. या दु:खात आम्ही एकत्र आहोत असं त्यांनी म्हटलं.
आयपीएलच्या १८ व्या सीजनमध्ये पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने विजेता पदाचा खिताब पटकावला. त्यानंतर बुधवारी आरसीबी टीम अहमदाबादहून बंगळुरूला पोहचली. याठिकाणी टीमची विशेषत: विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमले होते. आरसीबी टीमची विजयी परेड काढण्यात येणार होती परंतु गर्दीचा अंदाज न आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव टीमला थेट स्टेडियमला नेण्यात आले. लाखोंच्या संख्येने स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी झाली. यावेळी लोक झाडावर, कारवर, बसवर, भिंतीवर चढून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.