मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही माध्यमांवर ताशेरे ओढले आहेत. इगतपुरी येथील पक्षाच्या पदाधिकारी शिबिरादरम्यान झालेल्या अनौपचारिक संवादाचे विकृत आणि चुकीचे वृत्तांकन केल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १४ आणि १५ जुलै रोजी इगतपुरी येथे मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात राज ठाकरे यांचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. या संवादात ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याबाबत विचारणा झाली असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “तो मेळावा राजकीय नव्हता, तर मराठी माणसाच्या विजयाचा होता.”
‘युतीबाबत काय?’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी, “युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता?” असे उत्तर दिले. मात्र, काही निवडक इंग्रजी व मराठी माध्यमांनी चुकीची मथळेबाजी करत, “महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती पाहून युतीचा निर्णय घेतला जाईल,” असे विधान त्यांनी केल्याचे भासवले. या संदर्भात राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, “ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा म्हणजे अनौपचारिकच ठेवायच्या असतात. जे मी बोललोच नाही, ते माझ्या तोंडात घालणं, ही गंभीर बाब आहे. कोणाच्या सांगण्यावरून अशा बातम्या तयार करायच्या? आम्ही काही रोज-रोज पत्रकारांसमोर येऊन विधाने करावी अशी कोणाची अपेक्षा आहे का?”
ठाकरे यांनी ट्विटमध्ये पुढे टाइम्स ऑफ इंडिया सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रानेही यासारखी बातमी शहानिशा न करता प्रसिद्ध केली, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. “सोशल मीडियावर चालणारा गोंधळ पत्रकारितेत येऊ नये, हीच अपेक्षा आहे,” असंही त्यांनी म्हटलं. नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल! राज ठाकरे यांनी पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उल्लेख करत स्पष्ट केलं की, “१९८४ पासून माझा पत्रकारितेशी प्रत्यक्ष संबंध आहे. आमच्या घरातूनच साप्ताहिक आणि नियतकालिक सुरू झाली होती. मी व्यंगचित्रकार म्हणून अनेक नामवंत माध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे दर्जेदार पत्रकारिता कशी असावी, हे मला माहीत आहे.” शेवटी राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केलं की, “मला जर कोणतंही राजकीय विधान करायचं असेल, तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन. त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांनी आणि त्यांच्या संपादकांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे वागावं, हीच माझी विनंती आहे.”