पाटणा : “काँग्रेस आणि राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटलं आहे, हे लोक बिहारचा बदला घेत आहेत” असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शुक्रवारी(दि.१८)मोतिहारी येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते. तसेच पाटण्याला पुण्यासारखं आणि गयाला गुरुग्रामसारखं बनवलं जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्धाटन केलं.
निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोतिहारी येथे जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “ही भूमी चंपारण्यची भूमी आहे. या भूमीने इतिहास घडवला आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या या भूमीने गांधीजींना एक नवीन दिशा दाखवली. आता या भूमीची प्रेरणा बिहारसाठी एक नवीन भविष्य निर्माण करेल. आज येथून ७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. या विकास प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचं आणि बिहारमधील सर्व जनतेचं अभिनंदन करतो.”
पूढे बोलताना पंतप्रधान म्हणाले कि, “बिहारची भूमी ही आंदोलनाची भूमी आहे. आता ही भूमी बिहारला विकासाची एक नवीन दिशा देईल. एनडीए सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. काँग्रेसच्या राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटलं होतं. २०१४ नंतर तुम्ही मला केंद्रात सेवा करण्याची संधी दिली, आम्ही बदला घेण्याचं हे राजकारण संपवलं. दोन दशकांपूर्वी बिहारचा हक्काचा पैसा कसा लुटला गेला हे आजच्या पिढीने जाणून घेणं महत्त्वाचं आहे.”
“आमचा संकल्प आहे की येणाऱ्या काळात, मुंबईप्रमाणेच मोतीहारी ओळखलं जावं. गुरुग्राममध्ये ज्याप्रमाणे संधी आहेत, त्याचप्रमाणे गयामध्येही अशाच संधी निर्माण केल्या पाहिजेत. पुण्याप्रमाणे पाटण्यात औद्योगिक विकास झाला पाहिजे. सूरतप्रमाणे संथाल परगणा देखील विकसित झाला पाहिजे. जयपूरप्रमाणे जलपाईगुडी आणि जाजपूरनेही पर्यटनाचे नवे विक्रम प्रस्थापित केले पाहिजेत. बंगळुरूप्रमाणे वीरभूमच्या लोकांनीही प्रगती केली पाहिजे” असं मोदींनी म्हटलं आहे.