नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमधील मतदार यादीच्या एसआयआरवरून सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, २०१४ पासून त्यांना भारताच्या निवडणूक व्यवस्थेबद्दल शंका आहे आणि अलिकडच्या काळात काही निवडणूक निकालांमुळे हा संशय आणखी वाढला आहे. विज्ञान भवनात आयोजित काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय कायदेशीर परिषदेत’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुका, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश निवडणुकांचे निकाल नैसर्गिक नव्हते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अवघ्या चार महिन्यांत विधानसभेत मोठा पराभव झाला.जो सामान्य नव्हता. काँग्रेसने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि महाराष्ट्रात काही पुरावे सापडले जे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचे दर्शवतात.
काँग्रेसच्या कायदा, मानवाधिकार आणि माहिती अधिकार विभागाने ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, काँग्रेस कायदा, मानवाधिकार आणि माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष डॉ. अभिषेक मनु सिंघवी आणि देशभरातील अनेक ज्येष्ठ नेते आणि वकील उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान यादीत एक कोटी नवीन मतदार जोडले गेले आणि त्यापैकी बहुतेक मते भाजपला गेली. ते म्हणाले की. काँग्रेसने सहा महिने या विषयावर संशोधन केले. पण निवडणूक आयोगाने सहकार्य केले नाही. आयोगाने त्यांना कागदी मतदार याद्या दिल्या. ज्या स्कॅन किंवा कॉपी करता आल्या नाहीत. या याद्यांची सखोल तपासणी केली असता असे आढळून आले की, साडेसहा लाख मतदारांपैकी सुमारे दीड लाख बनावट आहेत. राहुल म्हणाले की, आता त्यांच्याकडे १०० टक्के पुरावे आहेत आणि ते लवकरच ते सार्वजनिक करतील.
राहुल गांधी म्हणाले की, भारताची निवडणूक व्यवस्था आता निष्पक्ष राहिलेली नाही आणि निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्था नष्टझाल्या आहेत. या देशात सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कोणालाही लक्ष्य केले जाते. ते म्हणाले की, सध्या ते स्वतः डझनभर खटल्यांना तोंड देत आहेत. कृषी कायद्यांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. पण काँग्रेसचा डीएनए संघर्षाचा असल्याने त्यांनी झुकण्यास नकार दिला. स्वातंत्र्य लढ्यातील वकिलांच्या भूमिकेचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, गांधी, नेहरू, पटेल आणि आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्यात हजारो वकिलांनी योगदान दिले. ते म्हणाले की, आज जेव्हा संवैधानिक संस्था पद्धतशीरपणे कमकुवत केल्या जात आहेत .तेव्हा न्यायालयांमध्ये संविधानाचे रक्षण करणे ही देशातील वकिलांची जबाबदारी आहे. काँग्रेस राजकीय आणि सामाजिक पातळीवर ही लढाई लढत आहे. पण संवैधानिक आणि कायदेशीर लढाई वकिलांनाच लढावी लागेल. त्यांनी शेवटी विश्वास व्यक्त केला की, जेव्हा ते त्यांच्याकडे असलेले पुरावे देशासमोर सादर करतील तेव्हा निवडणूक व्यवस्थेबद्दल जनतेचे डोळे उघडतील.