मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज(दि.१२) राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली.या बैठकीत गृह विभागाने मांडलेला १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयानुसार, कोणत्या जिल्ह्यात किती भरती होणार हे अजून स्पष्ट झाले नाही. पण त्याची एक जाहिरात निघेल. त्यानंतर लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. राज्यातील हजारो तरुण या पोलिस भरतीची प्रतिक्षा करत होते. या निर्णयाद्वारे त्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत चार निर्णय घेण्यात आले आहे.राज्य मंत्रिमंडळाने पोलिस भरतीसह अन्न व नागरी पुरवठा विभाग, विमानचालन विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्याही प्रत्येकी एका निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, (गृह विभाग) – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५,००० पोलिस भरतीस मंजुरी, राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण (अन्न, नागरी पुरवठा विभाग), सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय (विमानचालन विभाग), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने दोन महिन्यांत ७० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. २०२२ – २०२३ वर्षातील १७ हजार ४७१ शिपायांची रिक्त पदे भरण्यासाठी यावर्षी १९ जून पासून मैदानी चाचण्या सुरू झाल्या. त्यात ११ हजार ९५६ पदांसाठी उमेदवार निवडण्यात आले असून त्यांना नियुक्ती पत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस शिपाई ९,५९५, चालक पोलीस शिपाई १,६८६ बॅण्डस्मन ४१, सशस्त्र पोलीस शिपाई- ४,३४९ पदे, कारागृह शिपाई १,८०० पदे असे एकूण १७,४७१ पदे भरण्याकरीता जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी एकूण १६ लाख ८८ हजार ७८५ उमेदवारांचे अर्ज झाले होते. १९ जून २०२४ पासून मैदानी चाचणी, कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात आली अशी माहिती राजाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी दिली होती.