भारत बनला जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश

0

नवी दिल्ली : भारताने तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत शेजारी देश चीनला मागे टाकत आता जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, भारताचे तांदूळ उत्पादन वाढून १५.१८ कोटी टनांपर्यंत पोहोचले आहे, तर चीनचे उत्पादन १४.५ कोटी टन इतके आहे. ही देशासाठी एक अभूतपूर्व कामगिरी आहे.

चौहान यांनी २५ पिकांच्या १८४ नवीन वाणांचे अनावरण करताना सांगितले की, देशाकडे सध्या मुबलक धान्यसाठा उपलब्ध असून त्यामुळे भारताची अन्नसुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित झाली आहे. विशेष बाब म्हणजे, अन्नटंचाई भोगणारा देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता जागतिक अन्नपुरवठादार बनला असून परदेशी बाजारपेठांमध्ये तांदूळ पुरवठा करत आहे. यामुळे जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होत आहे.

एका कार्यक्रमात कृषी मंत्र्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) वतीने विकसित करण्यात आलेल्या २५ प्रादेशिक पिकांच्या १८४ प्रगत वाणांचे सादरीकरण केले. त्यांनी पुढे सांगितले की, हे १८४ सुधारित वाण शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरतील, कारण त्यातून अधिक उत्पादन आणि उत्तम दर्जाची उपज मिळेल. तसेच, पिकांचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल.

कृषी मंत्र्यांनी नमूद केले की, देशाने अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या विकासात मोठे यश मिळवले आहे. उच्च उत्पादनक्षम आणि हवामानास अनुकूल बियाण्यांच्या विकासाच्या जोरावर भारत आता कृषी क्रांतीच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. त्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना या वाणांचा लाभ शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, याची खात्री करण्याचे निर्देश दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अधिक उत्पादन देणाऱ्या ३,२३६ वाणांना मान्यता दिली आहे, तर १९६९ ते २०१४ या कालावधीत केवळ ३,९६९ वाणांचीच अधिसूचना जारी करण्यात आली होती. १९६९ मध्ये राजपत्र अधिसूचना प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ७,२०५ पिकांच्या वाणांना अधिसूचित करण्यात आले आहे. यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, मका, कडधान्ये, तेलबिया आणि तंतूवर्गीय पिकांचा समावेश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech