नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची भरती करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने १,००० हून अधिक वैमानिक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील कोणत्याही एअरलाइनकडून राबविण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या भरती मोहिमांपैकी ही एक मानली जात आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात निर्माण झालेल्या कामकाजातील अडचणी आणि मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अवघ्या सात दिवसांत ५,००० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली होती. वैमानिकांच्या उपलब्धतेअभावी नियोजित उड्डाण वेळापत्रक कोलमडले होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत कंपनीने आता ट्रेनी फर्स्ट ऑफिसर, सीनियर फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन या विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे ठरवले आहे. कंपनीचा विस्तार, वाढता प्रवासी ताण आणि नियामक अटी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
इंडिगो दरमहा आपल्या ताफ्यात चार नवीन विमाने सामील करत आहे. या नव्या विमानांसाठी प्रशिक्षित वैमानिकांची गरज भासणार आहे. सध्या कंपनी दरमहा २० ते २५ फर्स्ट ऑफिसरना पदोन्नती देऊन कॅप्टन बनवत आहे. मात्र एका ट्रेनी ऑफिसरला पूर्णपणे तयार होण्यासाठी सुमारे सहा महिने लागतात. कॅप्टन पदासाठी किमान १,५०० तासांच्या उड्डाण अनुभवाची अट आहे आणि कंपनी हे निकष अधिक कडक करत असल्याची माहिती आहे.
नियमांनुसार प्रत्येक विमानासाठी वैमानिकांचे तीन संच आवश्यक असतात, ज्यात एक कॅप्टन आणि एक फर्स्ट ऑफिसर असतो. परंतु इंडिगोच्या विमानांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने प्रत्यक्षात मानकापेक्षा दुप्पट वैमानिकांची गरज निर्माण होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या तपासणीत असे आढळले होते की कंपनीला २,४२२ कॅप्टनची आवश्यकता असताना त्यावेळी केवळ २,३५७ कॅप्टन उपलब्ध होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नियामक संस्थेने १० फेब्रुवारीपर्यंत रात्रीच्या ड्युटी नियमांमध्ये काही तात्पुरती सूट दिली होती.
डिसेंबरमध्ये निर्माण झालेल्या संकटामागे वैमानिकांच्या विश्रांतीसंदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी हे एक महत्त्वाचे कारण होते. नवीन नियमानुसार रात्री १२ ते सकाळी ६ वाजेदरम्यान लँडिंगची संख्या मर्यादित करण्यात आली होती आणि साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला होता. डीजीसीएच्या तपासात असे स्पष्ट झाले की इंडिगोने या नियमांनुसार आवश्यक तेवढी भरती केली नव्हती तसेच प्रशिक्षण प्रक्रियेलाही पुरेसा वेग दिला नव्हता.
परिणामी वैमानिकांवरील कामाचा ताण वाढला आणि मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली.या पार्श्वभूमीवर इंडिगोची ही व्यापक भरती मोहीम भविष्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वाढत्या प्रवासी मागणीला प्रतिसाद देताना कंपनी आता मनुष्यबळ बळकटीकरणावर भर देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.