ग्लासगो : भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आपले वर्चस्व राखता आले नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते, तर यावेळी श्रीलंकेचा पाथिरागे त्याच्या मार्गात उभा राहिला. श्रीलंकेचा स्टार भालाफेकपटू रुमेश थरंगा पाथिरागेने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ९० मीटरच्या जवळपास ८९.७५ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. मात्र, नीरज चोप्रा ९० मीटरचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरला, त्यामुळे ऑलिम्पिकनंतर त्याला पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
नीरज व्यतिरिक्त, यशवीर सिंगनेही भारतासाठी भालाफेकीतील दुसरे पदक मिळवून एक स्टार खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले. नीरजने ८५.८३ मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले, तर यशवीरने ८५.४१ मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावले. पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रिकाम्या हाताने परतला. नीरजला मात्र, पुन्हा एकदा ९० मीटर अंतर पार करता आले नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटरचे अंतर गाठले होते, पण यावेळी नीरजला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेने ८२.८४ मीटरच्या थ्रोसह पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर पाथिरागेने अंतिम फेरीत आपल्या पहिल्या प्रयत्नात जवळपास ८४ मीटरचा थ्रो केला, पण फाऊलमुळे तो अवैध ठरवण्यात आला. त्यानंतर पाथिरागेने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८९.७५ मीटरचा थ्रो करून सर्वांना मागे टाकले आणि नीरजवर दबाव आणला. सुवर्णपदक जिंकण्यासाठी आता नीरजला ९० मीटरचे अंतर पार करणे आवश्यक होते. त्यानंतर पाथिरागेने आणखी तीन फाऊल केले आणि तो स्वतःचे अंतर पार करू शकला नाही. पण, ८९.७५ मीटरच्या थ्रोसह तो शेवटपर्यंत आघाडीवर राहिला आणि श्रीलंकेसाठी सुवर्णपदक निश्चित केले.
गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर नीरज चोप्राने यावर्षी पुनरागमन केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हा त्याचा दुसरा सहभाग होता. यापूर्वी त्याने २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्रा म्हणाला, “हंगामातील उर्वरित सामन्यांची तयारी करत असताना, सुधारणेला अजून खूप वाव आहे. निश्चितच, सुधारणेला अजूनही वाव आहे, मी असे म्हणणार नाही की या हंगामात माझी खूप सुधारणा झाली आहे… मी यापेक्षाही चांगली कामगिरी करू शकलो असतो… आता आगामी स्पर्धांमध्ये हळूहळू सुधारणा करत राहणे हेच ध्येय आहे.”