नाशिकच्या रामकुंड परिसरात पाच जण बुडाले, एकाचा दुर्दैवी मृत्यू

0

नाशिक : नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या ५ जणांसोबत दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मुंबईहून आलेले पर्यटक पाण्यात बुडू लागले. स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक दलाने तातडीने बचावकार्य करत चौघांना सुखरूप बाहेर काढलं असून एकाचा मृत्यू झाला आहे. गोपाल गुप्ता असं १४ वर्षीय मृताचं नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं रामकुंड परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर भारतीय असलेले आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असणारे जवळपास ४० जण धार्मिक पर्यटनासाठी नाशिकला आले होते. सकाळी गोदावरीत स्नान करण्यासाठी ते रामकुंड परिसरातील चक्रधर स्वामी मंदिरावाजवळ पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडायला लागले. याबाबत माहिती मिळताच गंगेवरील जीवरक्षक दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.

यावेळी चौघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या १४ वर्षीय गोपाल गुप्ता या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेनं चाळीस जणांच्या ग्रुपवर दु:खाचा डोंगर कोसळला. सकाळी गोदावरीत स्नान करून ते शिर्डीला जाणार होते. मात्र, रामकुंडातील दुर्घटनेमुळे त्यांच्यावर शोककळा पसरली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech