मंगेश तरोळे-पाटील
मुंबई : बिजापूर जिल्ह्यातील एका गावातील ११ वर्षांच्या मुलीने वैद्यकशास्त्राच्या मते अशक्य मानले जाणारे कार्य करून दाखविल्यामुळे सर्व बाजुने कौतुकाचा वर्षांव होत आहे. याच वर्षी मार्च महिन्यात एका भटक्या कुत्र्याने तिला चावले होते. कुटुंबीयांनी घरच्या घरी घरगुती आणि देशी उपचारांचा आधार घेतला, परंतु तिची प्रकृती बिघडू लागली. तिला पाण्याची भीती वाटू लागली. तोंडातून फेस येणं आणि झडप घालणे अशी वर्तन ती करू लागली. ही रेबीजची गंभीर लक्षणे तिच्यात दिसून येऊ लागली. रेबीज हा एक अत्यंत जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे, ज्यातून वाचलेले लोक जगात फार कमी आहेत. अशा परिस्थितीत, एका ११ वर्षांच्या मुलीने केवळ १० दिवसांत रेबीजच्या विषाणूवर मात करून दाखवली आहे. आरोग्य क्षेत्रात ही एक ‘चमत्कारा’पेक्षा कमी नाही. योग्य वेळी आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे हे शक्य झाले असून, यामुळे रेबीजच्या उपचारांना नवी दिशा मिळू शकते.
काही दिवसांपासून अनेक राज्यात ठिकाणी भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. आणि अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अशा वेळी काय काळजी घ्यावी यामध्ये अनेकदा लोक गोंधळतात, आणि उपचारांमध्ये विलंब होतो आणि माणसाचा जीव जातो. अशा वेळेस योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते आणि शक्य तितक्या लवकर उपचार करणेही महत्वाचे असते. या अवस्थेत उपचार शक्य नसतात. पण यावेळी चमत्कार घडल्याचा पाहायला मिळाले. मुलीला जेव्हा दवाखान्यात आणले गेले. तेव्हा ती वेड्यासारखे वागत होती. डॉक्टर अनुरूप साहू यांनी तिच्यावर सिम्टोमेटिक उपचार सुरू केले. ती मानसिकदृष्ट्या खूप मजबूत होती. लक्षणांनुसार औषधे दिल्यानंतर ती जलद बरी होऊ लागली. रेबीजची लक्षणे विकसित झाल्यानंतर रुग्ण बरा झाल्याचे यापूर्वी कधीही दिसले नव्हते, कारण विशेष अँटी-रेबीज एन्सेफलिटिक इंजेक्शन किंवा औषध उपलब्ध नाहीत. मात्र तिच्या इच्छाशक्तीमुळे तिला नवे जीवन मिळाले. ती १० दिवसांपूर्वी दाखल झाली होती आणि १८ ऑक्टोबर रोजी तिला सुटी देण्यात आली.