नवी दिल्ली : एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थातच एएआयबीने एअर इंडिया १७१ विमान अपघाताबाबतचा आपला प्राथमिक अहवाल नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला आहे. हा अहवाल प्राथमिक मूल्यांकनावर आणि तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गोळा केलेल्या निष्कर्षांवर आधारित आहे. याअहवालात नेमके काय आहे ते अद्याप सार्वजनिक केलेले नाही. चौकशी अहवालाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अहवाल या आठवड्याच्या शेवटी सार्वजनिक केला जाऊ शकतो.
प्राथमिक अहवालात काय आहे ते उघड झाले नसले तरी, असे मानले जाते की, त्यातून अपघाताच्या कारणांबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या ३२ सेकंदातच कोसळले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत आसन क्रमांक ११ ए वर बसलेला फक्त एकच व्यक्ती बचावला होता. १२ जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान मेघनानगर परिसरातील एका वसतिगृह संकुलात कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला होता. आणि वसतिगृहातील काही नागरिकांचाही या अपघातात मृत्यू झाला होता.