मुंबई : राज्य विधानसभेत विरोधीपक्षनेत्याच्या नियुक्तीवरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. विधीमंडळात आज, मंगळवारी सरन्यायमूर्ती भूषण गवईंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी असले त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात घटना आणि कायद्याचा विचार करून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम होता. त्यामुळे विरोधकांनी आताच्या आता विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घ्या, असं म्हणणं चुकीचं आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितलं.
दरम्यान, यापूर्वीही सरकार स्थापन झाल्यानंतर ४ महिन्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्यात आली आहे. असा दाखला अध्यक्षांनी दिला. मात्र, गेल्या काही महिन्यापासून आपण यावर विचार करत आहेत. पण, निर्णय कोणताही घेत नाहीत. केवळ वेळ घालवत असल्याचे भास्कर जाधव आणि जयंत पाटील म्हणाले. तसेच राज्य सरकार विरोधकांची गळचेपी करीत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच यावेळी विरोधकांनी सभात्याग करून निषेध नोंदवला. त्यानंतर मविआच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केले. सरन्यायाधीशांचा सत्कार होत असताना सभागृह विरोधी पक्षाविना असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते पदावर आक्रमक होऊन महाविकास आघाडीतील आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. एवढेच काय तर महायुतीतील आमदार एका मागे एक विधान भवनात प्रवेश करत असताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.