नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात भारताला मोठे यश मिळाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने याबाबतची माहिती दिली आहे. भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची २८ आणि २९ जुलै २०२५ रोजी सलग दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. लष्कराच्या गरजेनुसार या चाचण्या घेण्यात आल्या. जेणेकरून हे क्षेपणास्त्र कमी आणि लांब अंतरावर किती अचूकपणे मारा करू शकते हे पाहता येईल.दोन्ही दिवशी क्षेपणास्त्राने निश्चित दिशेने उड्डाण केले आणि अचूकतेने लक्ष्य गाठले. डीआरडीओने म्हटले आहे की, या चाचणीने सर्व निर्धारित मानके आणि उद्दिष्टे पूर्ण केली. म्हणजेच क्षेपणास्त्राने अपेक्षेप्रमाणेच कामगिरी केली आहे.
भारताच्या संरक्षण शक्तीला अधिक बळकट करण्यासाठी बनवलेले ‘प्रलय’ हे एक स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. जे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केले आहे. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. जे लक्ष्यावर जलद आणि अचूकपणे मारा करण्यास सक्षम आहे. ‘प्रलय’ हे एक जलद प्रतिक्रिया देणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा अर्थ ते खूप कमी वेळात सोडले जाऊ शकते आणि शत्रूचे लक्ष्य नष्ट करू शकते. हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्याच्या कमी अंतराच्या हल्ल्याच्या क्षमतेला आणखी बळकटी देत आहे.