नवी दिल्ली : केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी खासदारांच्या बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) आणि कथित ‘मत चोरी’विरोधातील संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंतच्या मोर्चावर जोरदार टीका केली. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हणाले की, “एका माणसाच्या असंमंजसपणामुळे आणि एका कुटुंबामुळे देशाचे इतके नुकसान सहन करता येणार नाही. यासंदर्भात रिजिजू म्हणाले, “काँग्रेस आणि विरोधकांनी खूप वेळ वाया घातला आहे. आता आम्ही देश आणि संसद यांचा आणखी वेळ वाया जाऊ देणार नाही.
सरकार महत्त्वाचे विधेयक मंजूर करू इच्छित आहे. आज लोकसभा आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी महत्त्वाची विधेयकं मंजूर केली जातील. एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे आणि एका कुटुंबाच्या हट्टामुळे देश नुकसान सहन करू शकत नाही. अनेक विरोधी खासदारांनी स्वतः येऊन सांगितले की, त्यांना जबरदस्तीने गोंधळ घालण्यास सांगितले जात आहे. विरोधकांनी आज देकील निवडणूक आयोगाकडे जाण्यासाठी वेळ मागितला आणि आयोगाने ‘इंडि’ आघाडीतून प्रत्येकी २ सदस्य पाठवण्यास सांगितले. एकूण ३० सदस्यांना बोलावण्यात आले होते, पण ते गेलेच नाहीत. इंडिया आघाडी ३० सदस्य कोण असावेत हेही ठरवू शकली नाही. आता (मल्लिकार्जुन) खर्गे म्हणतात की सर्व विरोधी सदस्य व्हीआयपी आहेत, तर मग १५० लोक निवडणूक आयुक्तांच्या खोलीत जातील का ? असा प्रश्न रिजीजू यांनी उपस्थित केला.
तसेच इंडी आघाडीला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही, निवडणूक आयोगावर विश्वास नाही, संसद प्रणालीवरही विश्वास नाही. ते सातत्याने आपल्या देशातील घटनात्मक संस्थांवर हल्ला करत आहेत. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी वारंवार नाटक का करतात ? जनतेने आपल्याला देशसेवेकरिता पाठवले आहे, नाटकासाठी नाही. आमची शेवटची विनंती आहे की, आम्ही विधेयकं मंजूर करणारच, आणि तुम्ही चर्चेत भाग घ्या. नंतर विरोधकांनी हे खोटं सांगू नये की त्यांना बोलू दिलं नाही असा इशारा रिजीजू यांनी दिला.
दरम्यान, बिहारमध्ये मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) आणि कथित ‘मत चोरीच्या’विरोधात विरोधी खासदारांनी संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या वेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (उबाठा- गट) खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले.