मुंबई : लोकशाहीच्या मंदिरात मंत्री रमी खेळतात, आमदार वेटरला मारतात, सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होतात आणि सरकार त्यांना पाठीशी घालतं. हे सगळं लोकशाहीसाठी धोकादायक आहे. जर मुख्यमंत्री अशा मंत्र्यांना पाठीशी घालणार असतील, तर त्यांनी त्यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवावं. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यासाठी जाऊ, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. राज्यातील महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि मारहाण करणाऱ्या आमदारांविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन विस्तृत तक्रार निवेदन सादर केले.
राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. या निवेदनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात रमी खेळल्याचा आरोप, तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबाच्या बारमध्ये २२ बार गर्ल सापडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासह छावा संघटनेचे अध्यक्ष राहुल लोढे यांना आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. राज्याचा गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतो आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री झोपले आहेत का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
अजित पवार यांच्यावरही दानवे यांनी निशाणा साधला. “माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांचे संरक्षण मिळतंय. रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आलेला असतानाही कारवाई होत नाही. पुढे विधानभवनात कॅट (पत्त्यांचा संच) घेऊन जावं लागेल का?” असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या शक्यतेवर दानवे म्हणाले, “कोणताही प्लान केलेला नाही. पण एकास एक आलं, तर जनतेसाठी फायदेशीर ठरेल. आम्ही लोकांच्या न्यायालयात जायचं ठरवलं आहे. हेच आमचं खरे रणांगण आहे.”
यावेळी शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुषमा अंधारे, सुप्रदा फातप्रेकर, विशाखा राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, अनंत नर आणि महेश सावंत या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.