नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी (दि.१८) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी प्रोटोकॉल पालन न झाल्याने गवई यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नसणे ही एक गंभीर बाब आहे. सरन्यायाधीश गवई यांनी न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यपालिका यांच्यातील परस्पर सन्मानावर भर दिला आहे.
सरन्यायाधीश गवई यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँन्ड गोवातर्फे आयोजित सत्कार समारंभाला हजेरी लावली होती. न्या. गवई मुंबईत पोहचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त अथवा कुणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. यावर नाराजी व्यक्त करताना गवई म्हणाले की, जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती देशाचे मुख्य न्यायाधीश होते आणि प्रथमच महाराष्ट्रात येते, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांना उपस्थित राहणे आवश्यक वाटत नसेल, तर त्यांनी याबाबत विचार करायला हवा.पुढ ते म्हणाले की, प्रोटोकॉलचे पालन करण्याचा आग्रह मी धरत नाही. इतक्या किरकोळ बाबींमध्ये पडायचे नसले तरी लोकांना त्याबाबत माहिती म्हणून नमूद करत आहे. माझ्या जागी अन्य कुणी असता तर राज्यघटनेचा अनुच्छेद १४२ चा वापर केला असता अशी तीव्र नाराजी सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली.