मुंबई : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून लष्करी प्रशिक्षण दिले जाणार, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. मुलांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मुलांना लष्करी प्रशिक्षण दिले जाईल, यासाठी निवृत्त सैनिकांची मदत घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच एनसीसी स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील.त्यासाठी राज्यातील २.५ लाख माजी सैनिकांची मदत घेतली जाणार आहे.
लहानपणापासून मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, नियमित शारीरिक व्यायामाची सवय आणि शिस्त लागावी हा यामागचा उद्देश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, स्वतःच्या शरिराची काळजी घेणे, व्यायाम आणि शिस्त असे चांगले परिणाम समोर येतील, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.