चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे आज(दि.२) वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते मदुरईहून चेन्नईला बसने प्रवास करत असताना त्यांना छातीत दुखू लागले.तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.त्यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
विक्रम सुगुमारन हे तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील परमकुडी येथील रहिवासी होते. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या इच्छेने ते चेन्नईला आले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रसिद्ध दिग्दर्शक बालू महेंद्र यांचे सहाय्यक म्हणून केली. १९९९-२००० दरम्यान त्यांनी ‘जूली गणपती’ या लघुपटांमध्ये काम केले .
अभिनयाच्या क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. वेट्रिमारन यांच्या ‘पोलाधवन’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला, तसेच शशिकुमार यांच्या ‘कोडीवीरन’ मध्येही ते झळकले. मात्र, त्यांची खरी ओळख दिग्दर्शक म्हणून झाली. २०१३ मध्ये आलेल्या ‘माधा यानाई कूटम’ या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटाने ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करून प्रेक्षकांची मने जिंकली .
त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता शांतनू भाग्यराज यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना लिहिले, “प्रिय भाऊ, तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. तुमच्या आठवणी सदैव जपल्या जातील. तुमची खूप आठवण येईल.” त्यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान दिग्दर्शक गमावला आहे .