मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पारू आणि आदित्यच्या नात्याला मान्यता मिळावी म्हणून गेले कित्येक महिने प्रेक्षक वाट बघत होते. आता वाटतंय कि तो दिवस फार लांब नाही. पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून आदित्य गोंधळलेला आहे. त्याच्या मनात संघर्ष सुरू आहे. खोट्या लग्नाच्या आठवणी, पारूचं निस्वार्थ प्रेम आणि दिशाचे टोमणे, आदित्यच्या मनात अपराधीपणाची जाणीव निर्माण करतात. या भावनिक गोंधळात पुन्हा एकदा पारूशी खरंखुरं लग्न करण्याचा धाडसी निर्णय आदित्य घेणार आहे. पारूचा त्याच्यावरचा विश्वास, तिचं समर्पण आणि नात्याची श्रद्धा पाहून आदित्य पारूला न्याय द्यायचा आणि सर्वांसमोर तिचं स्थान मान्य करायचं ठरवतो.
मालिकेत देवीच्या उत्सवाचा माहोल सुरू आहे. गुरुजी संपूर्ण गावाला आमंत्रण देतात, आणि त्याच वेळी दमिनी आग्रह करते की मुख्य पूजेसाठी दिशा “नववधू” म्हणून पुढे यावी. पण आदित्य या गोष्टीला विरोध करतो. यावरून दिशा व आदित्यमध्ये वाद सुरु होणार आहे. पारू आपल्या मंगळसूत्र हे खोट्या लग्नाचं प्रतीक असल्याचा कबुलीजबाब गुरुजींसमोर देणार आहे. पण गुरुजी तिला थांबवतात आणि “हे मंगळसूत्र म्हणजे आदित्यच्या आयुष्याचं कवच असल्याचं सांगतात.” तर, दुसरीकडे आदित्यच्या सुरक्षिततेसाठी अहिल्या एक पवित्र यज्ञ करायचं ठरवते. या देवीच्या उत्सवातच, गुरुजी सर्वांसमोर आदित्य आणि पारूचं खरंखुरं, विधीवत लग्न लावून देणार आहेत. हा एक दिव्य संयोग आहे. दिशा आणि दमिनी पुन्हा एकदा अहिल्यावर मानसिक खेळी खेळायचा प्रयत्न करणार आहेत, पण यावेळी नियतीचं बळ त्यांच्या प्रत्येक पावलाला रोखतं. अहिल्या यज्ञ पूर्ण करते आणि त्या पवित्र क्षणी आदित्य आणि पारू एकत्र येऊन गुरुजींचं आशीर्वाद घेतात.