कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
(अनंत नलावडे)
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज अखेर सोमवार २३ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार २५ मार्च २०२६ पर्यत असे तब्बल एक महिन्यांचे निश्चित करण्यात आले आहे. यावेळी ६ मार्च २०२६ला अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून मंगळवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधानभवन येथे आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार, आमदार अनिल परब, प्रसाद लाड, भास्कर जाधव, जयंत पाटील, सुनील प्रभु, भाई जगताप, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या कामकाजाला सुरुवात करत असताना सुरुवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.यासंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
अधिवेशन काळात शनिवारी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे.तरं सोमवार २ मार्च २०२६ रोजी होळी आणि ३ मार्च २०२६ रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही.त्यानंतर १,७,८,१४,१५,२१,२२ मार्च रोजी शासकीय सुट्टी आणि १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक
सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही.तर २० मार्चलाही विधिमंडळ कामकाज होणार नाही.
या अधिवेशनात यावर होणार चर्चा….
● संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.या अधिवेशनात यावर चर्चा करण्यात येणार आहे.
● जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.
● मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होईल. तरं निवृत्त होणाऱ्या सदस्यांचाही निरोप समारंभ होईल.