‘ऑपरेशन सिंदूर’ पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते
मुंबई : भारतीय सेनेनं अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (7 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबाचे तळ उद्धवस्त, मध्यरात्री दीड वाजता कारवाई, दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं. हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे १०० किमी आत करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते. ९ टार्गेट ठेवण्यात आले होते. ९ च्या ९ टार्गेट यशस्वी झाले आहेत.