नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी बनवलेली पहिली उथळ पाण्यामध्ये उपयोगी पडणारी पाणबुडीविरोधी युध्दनौका -‘अर्नाळा’ (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) गुरुवारी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. हे जहाज पाण्याखालील देखरेख, शोध आणि बचाव कार्य, तसेच कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांसाठी (एलआयएमओ) डिझाइन केलेले आहे. या जहाजामध्ये किनारी पाण्यात पाणबुडीविरोधी क्रियाकलाप पार पाडण्याची क्षमता असून, प्रगत ‘माईन लेइंग’ क्षमतांनी सुसज्ज आहे. या प्रकारची जहाजे नौदलाच्या किनारी पाण्यातील पाणबुडीविरोधी क्षमतांमध्ये मोठी भर घालणार आहेत.
ही नौका गार्डन रीच शिपबिल्डर्स अॅन्ड इंजिनिअर्स (जीआरएसई), कोलकाता यांनी स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि निर्माण केले आहे. मेसर्स एल अँड टी शिपयार्ड, कट्टुपल्ली येथे ही युध्दनौका भारतीय नौदलाकडे ते सुपूर्द करण्यात आली. ही युद्धनौका इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस) च्या वर्गीकरण नियमांनुसार सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत जीआरएसई आणि मेसर्स एल अँड टी शिपयार्ड यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आली आहे, यामुळे सहकार्यात्मक संरक्षण उत्पादनाची यशस्वीता अधोरेखित होते.
या नौकेला ‘अर्नाळा’ हे नाव, वसईजवळील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून देण्यात आले आहे. हा किल्ला भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे. ७७ मीटर लांब असलेली ही युद्धनौका डीझेल इंजिन-वॉटरजेट संयोजनावर चालणारी सर्वात मोठी भारतीय नौका आहे. अर्नाळा’ भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या वाटचालीतील आणखी एक मैलाचा दगड असून, ८०% पेक्षा जास्त स्वदेशी घटकांसह केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला समर्पित आहे.