राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा”…….!

0

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे सक्त निर्देश…..

(अनंत नलावडे)
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ काही दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे सक्त आदेश प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बोलताना दिले. अपघात रोखायचे असतील तर केवळ नियमांची अंमलबजावणीच नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे, असेही सरनाईक यांनी मोटार परिवहन व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावले.

३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास मुंबई पुणे महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला. प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले.प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाल्याने सरनाईक म्हणाले, “चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.”

वाहनांच्या तांत्रिक तपासणीला वेग, पारदर्शकतेवर भर………

राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, असेही निर्देश देण्यात आले.विशेषतः फॉर्म १३८/A अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला.काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

‘ब्लॅक स्पॉट’वर विशेष लक्ष’…….

महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे—या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सविस्तर अहवाल……

महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.

खरंतर अजूनही मुंबई पुणे अपघाताची वेदना अजून ताजी असताना शासनाने घेतलेली ही धडक भूमिका म्हणजे केवळ प्रशासकीय हालचाल नाही, तर प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी उचललेले ठोस पाऊल आहे.नियम, नियंत्रण आणि जागरूकता या त्रिसूत्रीवरच सुरक्षित प्रवासाचा पाया उभा राहणार, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आल्याचे बोलले जाते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech