नौदल उतरले असते तर पाकिस्तानचे ४ तुकडे निश्चित होते

0

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विक्रांत युद्धनौकेवर दावा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय नौदल सक्रीय झाले असते तर पाकिस्तानचे ४ तुकडे होणे निश्चित होते असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. संरक्षण मंत्र्यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर जाऊन नौदलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नौदलासंदर्भात उपरोक्त खुलासा केला. याप्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. जर पाकिस्तानने आणखी काही चूक केली तर त्याला सावरण्याची संधी देखील मिळणार नाही.

आमचे नौदल पिकस्तानात त्सुनामी आणू शकते. पाकिस्तानला असे उत्तर देऊ की, त्याने कधी कल्पना देखील केली नसेल. पाकिस्तान वारंवार चर्चेचा प्रस्ताव देत आहे. कालच पाकिस्तानी पंतप्रधान चर्चेबद्दल बोलले. पण, आमची स्पष्ट भूमिका आहे की, यापुढे फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होणार असे राजनाथ यांनी सांगितले. पाकिस्तानने हाफिज सईद आणि मसूद अझहरला भारताच्या स्वाधीन करावे. हाफिज सईद मुंबई हल्ल्यात सहभागी होता आणि त्याला जबाबदार धरले जाईल. जर पाकिस्तानने पुन्हा काही आपल्या कुरापती सुरू केल्या, तर नौदल देखील युद्धात उतरेल अन् मग पाकिस्तानचे काय होईल, हे देवालाच माहिती.

यापूर्वी १९७१ मध्ये जेव्हा नौदल आले होते, तेव्हा पाकिस्तानचे २ तुकडे झाले होते. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल आले असते, तर पाकिस्तानचे ४ तुकडे झाले असते, असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला. भारतीय नौदलाने कारवाई केल्याने काय परिणाम होतात, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक आहे. भारत कुठेही कधीही अन् कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आपल्या सैन्याचे मनोबल डोंगरासारखे मजबूत आहे. आपली बाजू इतकी मजबूत आहे की, पाकिस्तान संपूर्ण जगासमोर विनवणी करत असल्याचे राजनाथ यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech