मुंबई : पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, मलाही अनेकदा प्रलोभनं देण्यात आली होती, मात्र ती ठामपणे नाकारली. पैसे दिले तरीही मत विकू नका. मुंबई वाचवायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि आपल्याकडे ही शेवटची संधी आहे, असा कानमंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवतीर्थ’ येथे मनसेच्या सगळ्या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. या युतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली जात आहे. मनसे मुंबईत ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, प्रत्येक बूथवर आपली किमान दहा माणसं उभी करा. बोगस मतदान होता कामा नये. तुम्ही सतर्क राहा. जर बोगस मतदार सापडला, तर त्याला तिथेच फटकावून काढा.