भुवनेश्वर : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि मयूरभंजच्या माजी खासदार सुशीला तिरिया यांचे निधन झाले आहे. ७० वर्षांच्या तिरिया अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होत्या आणि त्यांच्यावर भुवनेश्वरमधील एम्स येथे उपचार सुरू होते. रविवारी संध्याकाळी त्यांनी एम्स येथे अखेरचा श्वास घेतला. सुशीला तिरिया या एक ज्येष्ठ आदिवासी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. १९८६ मध्ये त्या ओडिशातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर १९९४ आणि १९९६ मध्ये त्या मयूरभंज लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आल्या. त्यांनी काँग्रेस पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सदस्या म्हणूनही काम केले.
ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष भक्त चरण दास यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दास म्हणाले, “माजी खासदार आणि माजी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य सुशीला तिरिया यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. आदिवासी कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांची वचनबद्धता नेहमीच लक्षात राहील.” काँग्रेस नेते नवज्योती पटनायक म्हणाले की, सुशीला तिर्य यांच्या निधनाने उत्तर ओडिशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते म्हणाले, “त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेसाठी समर्पित केले. मयूरभंज प्रदेशाच्या विकासासाठी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांचा खंबीर आवाज नेहमीच लक्षात राहील.”