ठाणे : मंगळवारपासून (10 फेब्रुवारी) राज्यात बारावीच्या तर 20 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्या आगामी परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, वेळेचे योग्य नियोजन करावे तसेच तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले. यशासाठी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पालक व शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकत सांगितले की, विद्यार्थ्यांना या काळात मानसिक आधार व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. “विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. अपयशाची भीती न बाळगता शांतपणे परीक्षेला सामोरे जावे. प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होवो, हीच माझी सदिच्छा आहे,” असे शुभेच्छा संदेशात त्यांनी नमूद केले आहे.