पश्चिम आशिया तणाव : भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने सुरु केला नियंत्रण कक्ष

0

नवी दिल्ली : पश्चिम आशियात वाढत चाललेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू केला आहे. या कक्षाचा उद्देश तेथील प्रभावित नागरिकांना मदत करणे हा आहे. मंत्रालयाने सांगितले की, पश्चिम आशियात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत आणि त्यांची सुरक्षा व कल्याण ही भारत सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे.
इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षामुळे तेहरानमधील भारतीय दूतावासाने मोठे पाऊल उचलले आहे. दूतावासाने शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना राजधानी तेहरानमधून सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी माहिती दिली की, आखाती प्रदेशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.नागरिक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पुढील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात — 1800118797 (टोल फ्री), +91 11 2301 2113, +91 11 2301 4104 आणि +91 11 2301 7905.

या प्रकरणात अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर लष्करी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्याच्या प्रत्युत्तरात इराणनेही अनेक हल्ले केले आहेत. इराणने मुख्यतः इस्रायल आणि आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिराती (युएई), बहरीन, कुवैत, जॉर्डन आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले की आखाती प्रदेशात राहणाऱ्या एक कोटी भारतीयांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या कोणत्याही घडामोडीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मंत्रालयाने नमूद केले. भारत सरकार बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशहित लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेईल. यासाठी मंत्रालय त्या भागातील सरकारे आणि इतर सहयोगी देशांशी सतत संपर्कात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech