मुंबई : बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात केले. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील असंख्य शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांनी आज के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.
आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जात-पात, धर्म कधी पाळला नाही. अठरापगड जातींना घेऊन शिवरायांनी जसे राज्य केले. त्याचपध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. शिवसेना तुम्हाला चालत असेल तर भाजप का चालत नाही. काहीजण सोयीनुसार कार्यकर्त्यांना सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार होते त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे असे ठरले होते. याला सर्वच आमदार साक्षीदार आहेत ही माहिती देतानाच मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही. सर्वाधिक सत्ता मी उपभोगली आहे अशी स्पष्ट कबुलीही अजितदादा पवार यांनी दिली.
लोकांचे प्रश्न सुटावे, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी काम करत आलो आहे. राज्यात उभारली जाणारी महापुरूषांची स्मारके भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल अशी कामे सरकार करत आहे असेही अजितदादा पवार म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराशिवाय काहीच करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातून हाताला काम मिळणार आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.