नवी दिल्ली : भारतीय रेल्वे वंदे भारत, बेंगळुरू राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्लास्टिक प्लेट्सऐवजी बायोडिग्रेडेबल ताटांचा वापर करणार आहे. मार्च महिन्यापासून सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे दरमहा ३०० किलोहून अधिक प्लास्टिकची बचत होणार आहे. आयआरसीटीसीचे उद्दिष्ट रेल्वे परिसर प्लास्टिकमुक्त करणे आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लावणे आहे, कारण बायोडिग्रेडेबल ताटे ३ ते ६ महिन्यांत नैसर्गिकरित्या नष्ट होतात. भारतीय रेल्वे मोठा बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. आयआरसीटीसीने वंदे भारत, बेंगळुरू राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेससाठी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या गाड्यांमध्ये आता स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल ताटांचा वापर केला जाणार आहे. वंदे भारत, शताब्दी आणि बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना आता प्लास्टिक प्लेट्सऐवजी बायोडिग्रेडेबल ताटांत जेवण दिले जाईल.
यामुळे दरमहा ५० हजारांहून अधिक ताटांमधून ३०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिकची बचत होईल.आयआरसीटीसी सातत्याने रेल्वेगाड्यांमध्ये प्लास्टिकमुक्त परिसर निर्माण करण्यावर भर देत आहे. याच दिशेने एक पाऊल पुढे टाकत भारतीय रेल्वे आता प्लास्टिक प्लेटमध्ये जेवण देणे बंद करणार आहे. मार्चपासून वंदे भारत, शताब्दी आणि बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसमध्ये बायोडिग्रेडेबल ताटांत जेवण वाढण्यास सुरुवात होईल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रथम या निवडक गाड्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल आणि त्यानंतर इतर प्रीमियम तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही प्लास्टिक प्लेट्स काढून टाकून बायोडिग्रेडेबल प्लेट्सचा वापर केला जाईल.
ताटांच्या वापरामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मोठा हातभार
बायोडिग्रेडेबल ताटे भाजीपाला-फळांच्या साली, कागद आणि इतर नैसर्गिक घटकांपासून तयार केली जातात. वापरानंतर ही ताटे ३ ते ६ महिन्यांत आपोआप विघटित होतात. या ताटांच्या निर्मितीत वापरलेले घटक कमी कालावधीत कुजून मातीत मिसळतात, तर प्लास्टिक प्लेट नष्ट होण्यासाठी ४०० ते ५०० वर्षे लागतात. त्यामुळे बायोडिग्रेडेबल ताटांच्या वापरामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मोठा हातभार लागणार आहे.