अमृतसर : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुरुवारी अटारी बॉर्डर बंद करून स्वतःच्याच नागरिकांना घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज, शुक्रवारी अटारी बॉर्डर गेट पुन्हा उघडले असून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी जिहादींकडून २६ हिंदूंचे टार्गेट किलींग करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा अल्पकालीन व्हिसा रद्द करून १ मे २०२५ पर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. परंतु, पाकिस्तानने स्वतःच्याच नागरिकांसाठी अटारी गेट बंद केल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परतण्याची परवानगी देऊन पाकिस्तानने शुक्रवारी अटारी-वाघा सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
पाकिस्तानमध्ये सुमारे २५ तास शांतता पाळल्यानंतर हे पाऊल उचलले गेले. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी दिलेली अंतिम मुदत ३० एप्रिल रोजी संपली. पाकिस्तानने गेट उघडले असते तर नागरिकांना पाठवता आले असते. अशा परिस्थितीत गुरुवारी संध्याकाळपर्यंत लोकांना सीमेवर रोखून ठेवण्यात आले. पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर पोहोचले आणि अनेक तास वाट पाहत राहिले. पण जेव्हा पाकिस्तानी रेंजर्सनी गेट उघडून लोकांना घेऊन जाण्यास नकार दिला तेव्हा संध्याकाळी सर्वजण परतले होते.