नवी दिल्ली : बांग्लादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे सुपुत्र तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने जोरदार बहुमत मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान आणि बीएनपीचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की हा विजय बांग्लादेशातील जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास दर्शवतो. तसेच भारत लोकशाही, प्रगतिशील आणि सर्वसमावेशक बांग्लादेशाच्या पाठीशी कायम उभा राहील, असेही त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की भारत-बांग्लादेश यांच्यातील बहुआयामी संबंध अधिक बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या सामायिक विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी ते तारिक रहमान यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.
दरम्यान बांगलादेशची संसद ३०० सदस्यीय असून बहुमतासाठी १५० जागांची आवश्यकता असते. तर बीएनपीने सुमारे १५१ जागांवर विजय मिळवत इतर मतदारसंघातही आघाडी घेतली आहे. बांगलादेशात गुरुवारी दुपारी ४ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. तर आज, शुक्रवारी ताज्या आकडेवारीनुसार, बीएनपी आघाडीने आतापर्यंत २०९ जागा जिंकून दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे.