गोंधळ घालणाऱ्या सर्वच दोषींवर कारवाई
नाशिक : नाशिकमध्ये तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या गोंधळाची चौकशी थेट मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष करणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. नाशिक येथील डोंगरे वसतीगृह येथे आयोजीत अखील भारतीय विद्यार्थी परीषदेच्या हिरक महोत्सवी वर्ष प्रदेश अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आले असता ते बोलत होते. नाशिकमध्ये तिकीटवाटपात गोंधळ झाला तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो. या प्रकाराची वरीष्ठ स्तरावरून दखल घेण्यात आली असून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण त्याबाबत चौकशी करणार असून प्रत्येक घटनेतील दोषींवर निश्चित कारवाई होईल. तसा अहवाल आम्ही राज्य स्तरावर पाठवणार असल्याची माहितीही महाजन यांनी दिली. बिनविरोध निवडीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना त्यांचे उमेदवार बिनविरोध आले की फटाके वाजवायचे आणि आता पराभव दिसू लागल्याने निवडणूक आयोग, यादी, पैसे, दादागिरी, मुंबई तोडायला चालले अशा ठराविक आरोपांची पुनरावृत्ती हास्यास्पद असल्याचे महाजन म्हणाले.
नाशिकमधील गोंधळ आणि शिरसाठ-बिरारी प्रकरणावर“थोडी लोटलोटी झाली आहे. माघारीनंतर असे अपेक्षित नव्हते; मात्र सगळ्याच पक्षांत असे प्रकार झालेले आहेत. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. सर्वांना तिकीट देता येत नाही, त्यामुळे नाराजी स्वाभाविक आहे. अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी माघारी घेतल्या आहेत. दोन-चार दिवसांत नाराजी शमेल आणि नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मुलाखतीवर टोला लगावत ते म्हणाले, लोक त्या मुलाखतीकडे हसत पाहतात. तु काय विचारायचे मी काय सांगायचे हे आधीच ठरेल असते. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.