नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी फोनवरून संवाद साधला. कुवैत दौऱ्यावर आजारी पडल्यामुळे आझाद सध्या रुग्णालयात दाखल आहेत. भारताचा दहशतवादविरोधी संदेश देण्यासाठी ते जगातील विविध राजधान्यांमध्ये पाठवलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळात सहभागी आहेत.
यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी आज, बुधवारी आझाद यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. आझाद यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे भाजप खासदार बैजयंत जय पांडा यांनी मंगळवारी सांगितले होते की आझाद यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. पांडा म्हणाले होते की बहरीन आणि कुवेतमध्ये झालेल्या बैठकांमध्ये आझाद यांचे योगदान खूप प्रभावी होते आणि ते त्यांच्या आजाराने निराश आहेत. गेल्या २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर मे महिन्यात शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरियाचा दौरा करत आहे.
भाजप खासदार बैजयंत जय पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने सोमवारी कुवेतचे उपपंतप्रधान आणि कॅबिनेट व्यवहार राज्यमंत्री शेरिदा ए एस अल-मोशरजी यांची भेट घेतली होती. शिष्टमंडळाने मोशरजींना सीमापार दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताच्या अलिकडच्या कृतींबद्दल माहिती दिली. हे शिष्टमंडळ भारताने ३३ जागतिक राजधान्यांना भेट देऊन पाकिस्तानच्या कारस्थानांची आणि दहशतवादाबाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनाची माहिती देण्यासाठी नियुक्त केलेल्या ७ बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी एक आहे.