संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन

0

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी जिहादी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट-किलींग केले होते. याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना अद्दल घडवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या कारवाईचे कौतुक आणि भारतीय सैनिकांचे अभिनंद केले आहे. यासंदर्भात संघाकडून जारी संदेशात म्हंटले आहे की, ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या नेतृत्वात आणि सैन्य दलांनी उचलेले महत्त्वाचे पाऊल आहे. जे क्रूर हत्याकांड दहशतवाद्यांनी घडवून आणले आणि भ्याड हल्ला केला तेव्हापासूनच देशवासियांच्या मनात पीडित कुटुंबांना, माता भगिनींना न्याय मिळावा ही देशभावना होती. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारचं आणि सैन्य दलांचं अभिनंदन करतो. सरकारने आणि सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याने संपूर्ण देशाची हिंमत वाढली आहे आणि त्यांची छाती अभिमानाने फुगली आहे.

पाकिस्तानने जे केले त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी दिलेलं उत्तर ही महत्त्वाची आणि अपरिहार्य कारवाई होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशा संकट काळात आम्ही तन-मन-धनासह देशाच्या सरकारच्या आणि सैन्य दलांच्या पाठिशी आहोत. पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांचा विचार न करता हल्ले केले जात आहेत. सीमा भाग आणि धार्मिक स्थळे यांना लक्ष्य केले जातेय. या घटनांमध्ये ज्यांना प्राण गमावावा लागला त्यांच्या प्रति आमच्या सहवेदना आहेत. आम्ही त्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचे संघाने सांगितले.

सध्या आपण युद्धजन्य स्थितीत आहोत. या आव्हानात्मक परिस्थितीत संघ म्हणून आम्ही देशवासीयांना आवाहन करत आहोत की सरकारने दिलेल्या सूचना आणि निर्देशांचं तंतोतंत पालन करा. तसेच राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात आपल्याला आपली एकजूट दाखवून देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य बजावून सरकारतर्फे जे सांगितले जाईल त्याचे तंतोतंत पालन या काळात करायला हवे. तसेच सरकारला सहकार्य करायला हवे. देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा यासाठी आवश्यक असलेल्या सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech