मुंबई : मुंबईतील आघाडीच्या दैनिकात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे. सांगली जिल्हा कुच्ची गावाहून माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्तान लिवर या कंपनीत नोकरी केली आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत लोकप्रिय झाले होते. मात्र पत्रकारितेतील आकर्षणामुळे त्यांनी ही नोकरी सोडली. श्री या आघाडीच्या साप्ताहीकापासून आपल्या पत्रकारीतेला सुरूवात केल्यानंतर त्यांनी दैनिक मुंबई संध्या ,दैनिक सामना व दैनिक लोकनायक व दैनिक पुण्यनगरी अशा आघाडीच्या दैनिकांमध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून नोकरी केली.राज्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे सबंध होते.तद्वतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे मंत्री आमदार व पक्षप्रमुखांसोबतही त्यांनी आपल्या स्वभावाने वेगळी छाप पाडलेली होती.
अलीकडच्या काळात तब्येतीमुळे ते अंथरूणातच होते. अशातच आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.सायंकाळी ७ वाजता बैलबाजार कुर्ला येथील सोनापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत हंडोरे, विविध सामाजिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते तसेच विविध दैनिकांचे पत्रकार, संपादक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. येत्या रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या स्मरणार्थ जलदान विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.