काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण शांतता; शाळा-महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद

0

श्रीनगर : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. निर्बंध कायम ठेवण्यात आल्यामुळे शैक्षणिक संस्था बंद राहिल्या. खोऱ्यातील शाळा-महाविद्यालयांची दोन दिवसांची सुट्टी खबरदारीचा उपाय म्हणून वाढवून ७ मार्चपर्यंत करण्यात आली आहे.
राजौरी आणि पुंछ येथे बंद शांततेत पार पडला, तर लदाखमधील कारगिल येथील बाजारपेठाही बंद राहिल्या. मंगळवारी श्रीनगरच्या सिव्हिल लाईन परिसरात काही दुकाने उघडी दिसली आणि रस्त्यांवर वाहनांची हालचालही सुरू होती. डाउनटाउन तसेच शिया बहुल भागांमध्ये निदर्शने झाली. लाल चौकातील घंटाघर परिसर अद्याप सील ठेवण्यात आला असून त्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.

पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बुधवारीही निर्बंध कायम राहणार असून इंटरनेट सेवा देखील अंशतः बंद ठेवण्यात येणार आहेत. हिंसा आणि भडकावू कृतींपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.राजौरी शहर आणि आसपासच्या भागात मुस्लिम संघटनांनी दुकाने बंद ठेवली. डोंगराळ भागांमध्येही मुस्लिम समाजाची दुकाने बंद होती. पोलिसांनी सर्व हालचालींवर कडक नजर ठेवली असून कोणतीही अप्रिय घटना घडल्याची माहिती नाही. पुंछ पूर्णपणे बंद राहिले. या काळात हिंदू-शीख धार्मिक, सामाजिक आणि व्यापारी संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला.

शांतता कायम ठेवणे आणि समाजाच्या प्रगतीचा मार्ग सुरू ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अधिकारी उच्च सतर्कतेवर राहावेत आणि शांतता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, असे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले. तर काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी संयम बाळगावा. राग, नाराजी किंवा दुःख व्यक्त करा, पण कायदा हातात घेऊ नका, असे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आवाहन केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech