उद्या काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष……
(अनंत नलावडे)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना ज्यांच्यावर या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी पक्षाच्या हायकमांड ने सोपवली होती ती “मुलुख मैदानी” तोफ उद्या शुक्रवारी पुन्हा एकदा तब्बल साडे तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत धडाडणार आहे. त्यामुळे आता सर्वच पत्रकारांचे लक्ष उद्या ही तोफ नेमकी कोणावर धडाडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची या मुलुख मैदानी तोफेचे नाव आहे माजी मंत्री, आमदार “नवाब मलिक.”ज्यांना आदराने सर्वच पत्रकारांमध्ये “भाई” या आदरार्थी नावाने ओळखले जातात.मुळात नवाब मलिक यांचा स्वभाव अगदी बेधडक…. एखादी पत्रकार परिषद घेत असताना आज ते नेमकी कोणाची “विकेट” घेणारं व कोणाला आपल्या शब्दांनी घायाळ करणारं याची कायम सर्वच पत्रकारांना कायम उत्सुकता असायची…. सध्या मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहेत…. मधल्या काळात आजाराने अस्वस्थ असलेल्या मलिक यांना त्यांच्या डॉक्टरांनी कोणाशीही जास्त न बोलण्याचा सल्ला दिला असल्याने तब्बल साडे तीन वर्षे मलिक यांना पक्षाने सर्वांपासून दूर ठेवले होते.
सध्या राज्यात तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी अगदी जोशात सुरु आहे. आणि राज्याच्या सत्तेत महायुती म्हणून सहभागी असतानाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर नवाब मलिक असतील तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नाही अशी काहीशी ताठर भूमिका भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी घेतल्याने मुंबईत तरी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी स्वबळावर एकीकडे शिंदेंची शिवसेना भाजपा महायुती समोर,दोन्ही ठाकरे बंधू व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भक्कम युतीसमोर तरं दुसरीकडे काँग्रेस, सपा, एमआएम, आदी पक्षांसमोर सर्वच जागांवर उमेदवार देत लढत देत आहेत….
याच नवाब मलिक यांनी २०१४ साली एकत्रित शिवसेना भाजप युतीच्या सत्ताकाळात कोणतीही भीडभाड न बाळगता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांवर पुराव्यासहित आरोप करून सलो की पलो करून सोडले होते. त्याला काऊंटर म्हणून भाजपच्या नेत्यांनी नवाब मलिक यांचे आंतरराष्ट्रीय कुख्यात स्मगलर व दहशतवादी टोळ्यांना फँडिंग करणारा दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा जाहीर आरोप विधिमंडळ अधिवेशनात केले होते. त्यावर याच मलिक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवरच पुराव्यानिशी आरोप करत त्यांना जेरीस आणले होते. अखेर भाजपच्या प्रचारात “नवाब मलिक नकोत”या हटवादी भूमिकेमुळे घायाळ झालेले मलिक शुक्रवारी घेत असलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत कोणाला “टार्गेट” करतात, आणि कोणाला आपल्या शाब्दिक बाणांनी घायाळ करतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.पण एक मात्र नक्की की गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेची अधिकृत घोषणा केली त्याचा सर्वात जास्त धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासकट सर्वच भाजप नेत्यांनी घेतल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून आले. तरं दुसरीकडे सर्व पत्रकारांचे “लाडके भाई” थेट पत्रकार परिषद घेणार या वृत्तानेच अधिक कुतूहल वाढले आहे हे मात्र नक्की……!