मुंबई : महाराष्ट्र हा आजपर्यंत नेहमी देशाला दिशा दाखवत आला आहे. राज्यातील जनतेला जुलूमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल. या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राला कोणत्या रांगेत नेऊन बसवले आहे? आपल्या काळातही मंत्र्यावर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेण्यात आले. मी मुख्यमंत्री असताना एकाचा राजीनामा घेतला, तो मंत्री अत्यंत वाईट वागत होता. तो वनमंत्री होता,त्याला आपण वनवासात पाठवले. आताचं सरकार जनताभिमुख नाही तर पैसे गिळणारं आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे गटाकडून सोमवारी मुंबईसह राज्यभरात महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. दरम्यान मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सत्ता येते आणि जाते, पण इतिहासात तुमची नोंद काय होते, ते महत्त्वाचे असते. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की, तुमच्यात जर थोडासाही अभिमान, स्वाभिमान आणि धैर्य शिल्लक असेल तर वरचा दबाव बघू नका. कारण खालचा दबाव वाढला, तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, अरे तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वर दिल्लीत तुमचे बापजादे बसलेत. तरीही तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाऱ्यांना काढायची. देवेंद्र फडणवीसांची हालत म्हणजे, स्वत: काही भ्रष्टाचार केला नाही, मग का त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय, का त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालताय? जगातला सर्वात मोठ्या पक्षाकडे अध्यक्ष करायला माणूस नाही. भ्रष्टाचाऱ्यांना दूर करुन मंत्रिमंडळात घ्यायला दुसरे कोणी नाहीत का? देवेंद्र फडणवीसांनी हा भ्रष्टाचार त्यांना पटतोय का, हे सांगावे. त्यांनी एकदा सांगावं की, मला सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. अन्यथा त्यांनी वरुन येणारा दबाव झुगारुन द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आमच्या परबांनी पुराव्यानिशी गृह राज्यमंत्री बार चालवतोय हे दाखवून दिले. रम्मीमंत्र्याला आता आवडीचं खातं मिळाले. शेतकऱ्यांची थट्टा करता, सभागृहात रम्मी खेळता. देवेंद्र फडणवीस भाजपची परंपरा चालवतील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री सांगतात आम्ही समज दिली. समज कसली तर रम्मी नको तर तीन पत्ती खेळा. भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सोडलं तर उपराष्ट्रपतींना का समज दिली नाही? धनखड कुठे आहेत, त्यांना समज देऊन का सोडलं नाही?, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.