“योगी देशातील शक्तीशाली व मेहनती मुख्यमंत्री”- सरन्यायमूर्ती

0

प्रयागराज : उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात शक्तिशाली आणि मेहनती मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. प्रयागराज येथील उच्च न्यायालयात ६८० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवनिर्मित अधिवक्ता चेंबर इमारती व मल्टीलेव्हल पार्किंगच्या उद्घाटनप्रसंगी गवई बोलत होते. यावेळी सरन्यायमूर्ती म्हणाले की, योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री असल्याचे केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल म्हणालेत आणि मी हे देखील म्हणतो की अलाहाबाद ही शक्तिशाली व्यक्तींची भूमी आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात प्रयागराजच्या भूमीचे खूप मोठे योगदान आहे. कायद्याच्या क्षेत्रात या भूमीचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे. स्वातंत्र्यापूर्वी मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, तेज बहादूर सप्रू आणि इतर अनेक कायदेपंडितांची गणना देशातील काही सर्वोत्तम वकिलांमध्ये केली जात असे. त्याचप्रमाणे, भारतातील हिंदी साहित्यात महादेवी वर्मा, हरिवंश राय बच्चन, सुमित्रानंदन पंत, सूर्यकांत त्रिपाठी-निराला, सुभद्रा कुमारी चौहान यांसारख्या प्रयागराजच्या अनेक विद्वानांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानाची संपूर्ण देश ओळखत असल्याचा उल्लेख सरन्यायमूर्तींनी केला.

भारतीय संविधानाचे ७५ वर्षांचे महत्त्व अधोरेखित करताना सरन्यायमूर्ती म्हणाले की, “जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले, तेव्हा संविधानाच्या जोरावर देश एकजूट आणि मजबूत राहिला. न्यायपालिका, कार्यपालिका आणि संसद या तीनही स्तंभांनी सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संपत्तीचे पुनर्वाटप करणारे अनेक कायदे आणले गेले, जमींदारांकडून जमीन घेऊन भूमिहीनांना देण्यात आली. गवई यांनी १९७३ च्या ऐतिहासिक १३ न्यायाधीशांच्या घटनात्मक खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख करत म्हटले की, “मुलभूत हक्क आणि नीति निर्देशक तत्वे ही संविधानाच्या आत्म्याची दोन चाके आहेत. यातील एखादं चाक थांबलं, तर संविधानाचा रथच थांबेल. बार आणि बेंच हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत. दोघेही एकत्र काम केल्याशिवाय न्यायप्रक्रियेचा रथ पुढे जाऊ शकत नसल्याचे सरन्यायमूर्तींनी अधोरेखीत केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech