कोकणातील शेतकऱ्यांनी गटशेती करावी – एकनाथ शिंदे

0

रत्नागिरी : कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातील शेतीक्षेत्र छोटे आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवले पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपे होते, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केले. तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ८० ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी सीएनजी घंटागाड्यांचे वितरण करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केले पाहिजे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तरच शेतकरी समृद्ध होईल. इथे उदरनिर्वाह होत नाही म्हणून इथला तरुण बाहेर जातो. त्याला रोजगार इथेच मिळाला पाहिजे, असे नियोजन केले पाहिजे.

सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जी वचने दिली आहेत, त्यात आमचे सरकार कुठेही मागे राहणार नाही. आम्ही ज्यासाठी निधी दिला, ती विकासकामे राबवली. महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, देशाच्या ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळाला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ झाली आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धुण्याचे कामही पंतप्रधानांनी केले. कोकणाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आमचं सरकार करील. पावसाचे पाणी अडवले पाहिजे. मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता कोकणासाठी वरदान ठरेल,’ असेही एकनाथ शिंदे म्हणाले. जिल्हा नियोजन निधीमधून शेतकऱ्यांना भात आणि नाचणीच्या बियाण्याचे मोफत वाटपही या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

नीलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने रत्नागिरीत उभारलेल्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे उद्घाटनही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या संस्थेने उभारलेले हे राज्यातलं तिसरे आणि रत्नागिरीतील पहिले रुग्णालय आहे. सरकार आरोग्य क्षेत्रात काम करत आहेच; पण अशा संस्थेने मोफत रुग्णालय उभारणे ही मोठी गोष्ट असून, संस्थेला जी काही मदत लागेल त्यासाठी सरकार पाठीशी उभे आहे, असं उपमुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले. ‘वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत रुग्णालय उभारणारा मुलगा विरळाच, अशा गौरवोद्गारांनी शिंदे यांनी नीलेश सांबरे यांचे कौतुक केले.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या पत्रकार कार्यशाळेलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. पत्रकार सन्मान निधीत वाढ, पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी असे विविध प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तातडीने मार्गी लावू, असे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech