सामाजिक कार्यात महिलांना संधी मिळायला हवी – कैलाश म्हापदी

0

ठाणे : सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढायला हवा. त्यांना संधी दिली तर तुमच्या इमारती निधीला ती नक्कीच रुपया आणून देईल, असा विश्वास दैनिक जनादेशचे संपादक आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी महाराष्ट्र सदस्य कैलाश म्हापदी यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त केला. ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी झटणार्‍या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेचे ५० वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुधागड तालुका मंडळ अध्यक्ष/प्रतिनिधींचा सत्कार सोहळा व सामाजिक मार्गदर्शन शिबीर ठाण्यातील मराठा मंडळ हॉल येथे मोठया उत्साहात सुधागडवासियांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सुधागड मित्र, ज्येष्ठ पत्रकार व शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती सदस्य कैलाश म्हापदी यांनी सुधागड वासियांना सामाजिक मार्गदर्शन केले तसेच सुधागड तालुका मराठा समाज माजी अध्यक्ष गणपत सितापराव यांचेही मार्गदर्शन लाभले.

ठाण्यातील मराठा मंडळ हॉल येथे सुधागड तालुका रहिवासी संघाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांतर्गत सुधागड तालुका शहरी मंडळ अध्यक्ष व प्रतिनिधींचा सत्कार समारंभ व सामाजिक मार्गदर्शना पार पडले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या ५० वर्षाच्या वाटचालीची ध्वनीचित्रफित दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना दाखविण्यात आली. तसेच संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी ठाणे शहरात संस्थेच्या इमारत निधीसाठी सढळ हस्ते देणगी देण्याचे आवाहन केले. सुधागड मित्र, ज्येष्ठ पत्रकार व शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती सदस्य कैलाश म्हापदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सुधागड तालुक्याच्या अनेक कार्यक्रमांत मी सहभागी होत असतो. एका कार्यक्रमात मी पाहिले व्यासपीठावर ६४ लोक बसले होते. मात्र त्यात एकही महिला नव्हती. आज महिला सक्षम होत असताना तिला व्यासपीठावर, विचारपीठावर स्थान दिलं जात नाही ही खेदाची बाब आहे. आपण त्या महिलेला संधी द्या, तिला संस्थेच्या कार्यात पुढे आणा ती देखील तुम्हाला नक्कीच रुपया आणून देईल, संस्था वाढविण्यासाठी जोमाने काम करेल. त्यानंतर ते पुढे म्हणाले, नुसते मातीत झाड लावून चालणार नाही. त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आपल्याला असायला हवं. दोन झाडांमधील अंतर, त्याची माती, शेतीची बदलती पद्धत आत्मसात केली पाहिजे.

भातशेती नव्या पद्धतीने केली पाहिजे. आज गाव-पाडे पाण्यावाचून तडफडताहेत. आपल्या गावाला, शेताला पाणी कसं येईल यासाठी प्रयोग करायला हवेत. डोंगरांना खाचा पाडून पाणी अडवलं आणि जिरवलं पाहिजे. तर तुमचं गांव समृद्ध होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपत सितापराव यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघात १९७०-८० च्या दशकात कार्यरत असताना केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. संघटन कसे तयार केले, आज संस्थेचे सभागृह उभे राहत आहे यासाठी सुधागड तालुक्यातील व्यक्ती, संस्था, व्यावसायिक, उद्योग क्षेत्राकडून निधी उभा करण्यासाठी आपण सहकार्य करणार असल्याचे सुतोवाच केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech