रत्नागिरी : मातृमंदिरच्या गोकुळ अनाथालयासाठी ५० लाखाचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. देवरूख मातृमंदिरच्या गोकुळ अनाथालय बालगृहाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माहेरवाशीण मेळाव्याचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेकरिता सीएसएसच्या माध्यमातून ५० लाखाचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मातृमंदिर गोकुळ ही देशातील एकमेव महत्त्वाची माझ्या जिल्ह्यातील सेवाभावी संस्था आहे. मावशींचे ऋण यासाठी मोठे आहे. माझ्या विभागामार्फत योग्य ते सहकार्य मिळवून देण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे. कार्यक्रमाला डॉ. प्रदीप ढवळ, विजय सराटे, रवींद्र पोखरकर, अभिजित हेगशेट्ये, मेघना चाळके, डॉ. समिधा गोरे, रोहन बने, प्रमोद पवार, विनय पानवलकर, विलास कोळपे तसेच गोकुळ अनाथालयाच्या महिला उपस्थित होत्या.