विधानभवन हाणामारीच्या घटनेवरून सर्व आमदारांची प्रतिमा मलिन झाली ! – मुख्यमंत्री

0

* आमदार माजले आहेत, अशी चर्चा सर्वत्र चालू आहे !

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या परिसरात गुरुवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र नापंसती व्यक्त केली. ते म्हणाले की, या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. सभागृहात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या आमदार गोपीचंद पडळकर किंवा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माणसाला पडत नाहीत. हे आमदार माजले आहेत, असे आपल्या सर्वांच्या नावाने याठिकाणी बोलले जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हाणामारीच्या घटनेवर विधानसभेत निवेदन केले. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्ती केली. ‘अध्यक्षांनी केलेल्या सूचनांचे मी तंतोतंत पालन करेन, तसेच १७ जुलैची जी घटना घडली आहे, त्यावर मी खेद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो’, असे ते म्हणाले. पडळकर यांच्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपण बोलत असतांना अभ्यांगत नितीन देशमुख हे माझ्यासमवेत आले होते; पण सभागृहात येताना मी प्रतिदिन एकटाच येतो. माझ्यासमवेत मी कुणालाही आणत नाही. माझ्यामागे केवळ माझा स्वीय साहाय्यक चालत असतो. त्याच्याशिवाय माझ्यासमवेत कुणीही नसतो. त्यामुळे नितीन देशमुख याला मी घेऊन आलो होतो हे रेकॉर्डवर चुकीचे जाऊ नये. ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो. मी परिसरातही नव्हतो. मी मरीन लाईन्समध्ये होतो. त्यामुळे या घटनेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा माझा कोणताही संबंध नाही. ही घटना घडावी म्हणून मी कुणाला उद्युक्त केले नाही. मी कुणाला खुणावलेही नाही. माझ्या व्हॉट्सॲपवर अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला मारण्याची धमकी देण्यात आली.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्येच हस्तक्षेप केला. ते म्हणाले की, या विषयाचे गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. तुम्ही इतर सर्व गोष्टी मला माझ्या दालनात येऊन सांगितल्या आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करून सुरक्षा रक्षकांकडून अहवाल मागितला; पण आता विरोधकांना या विषयाचे राजकारण करायचे असेल, तर हे योग्य नाही. आपल्याला सभागृहाच्या भावनेचा आदर केला पाहिजे.

अध्यक्षांच्या या भूमिकेवर शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धमकीचा उल्लेख करण्यास कुणाचीही मनाई नाही; पण विषय काय चालला आहे ? आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर आपण कधीतरी राजकारणाच्या पलिकडे जाणार आहोत की नाही ? ही प्रतिष्ठा काही कुणा एका व्यक्तीची नाही. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून विरोधक महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार आहेत ? अशा प्रकारे समर्थन करणे योग्य नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech