मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. वरळीकरांनी याचे संकेत आधीच दिले आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी वरळीच्या जांबोरी मैदानात आले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “पूर्वी वरळीत शिवसेनेचे (उबाठा) नेते दहीहंडीचे आयोजन करत होते. मात्र यंदा भाजपाने या मैदानावर भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. आज येथे जमलेली प्रचंड गर्दीच दाखवते की मुंबईची जनता भाजपाच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार आहे.” या प्रसंगी वरळीतील दहीहंडीचे आयोजक संतोष पांडे, तसेच मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.