दिव्या देशमुखचे यश देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल – मुख्यमंत्री

0

नागपूर : महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी आवश्यक आहे. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येत असून दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळविलेले देदीप्यमान यश हे देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही सन्मान करण्यात आला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री संदीप जोशी, अभिजित वंजारी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. परिणय फुके, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली-उगले, पोलिस आयुक्त डॅा. रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख, आई डॉ. नम्रता देशमुख, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित जिल्हा संघटनांचे पदाधिकारी, बुद्धिबळपटू, विद्यार्थी व नागपूरकर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिव्याने कमी वयात लक्ष विचलित न होऊ देत ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. बुद्धिबळात उत्स्फूर्तता, एकाग्रता आणि सजगता आवश्यक असते. बुद्धिबळ हा खेळ शंभरावर देशात खेळला जातो. त्यामुळे दिव्याने गाठलेले यश मोठे आहे. बुद्धिबळात चीनचे वर्चस्व राहायचे. चीनचे हे वर्चस्व जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख हिने धडक देत मोडून काढले. यात दिव्याने अंतिम फेरीत वयाच्या केवळ १९ व्या वर्षी विजय मिळविला. तिने कमी वयात मोठी उंची गाठली असून देशातल्या हजारो मुला-मुलींनी प्रेरणा मिळावी यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. दिव्याचे हे यश हजारो मुला मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, यशस्वी खेळाडू घडताना त्यांच्यामागे असलेले कुटुंब, प्रशिक्षक आणि व्यवस्थाही तितकीच महत्वाची असते. त्यामुळे त्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. मुलींना संधी, योग्य प्रशिक्षण आणि प्रेरणा दिल्यास त्या जग जिंकू शकतात. दिव्याने हे परिवर्तन सिद्ध करून दाखविले आहे. हे यश सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यावेळी म्हणाले. राज्य शासनाच्या माध्यमातून खेळाडूंना संधी तसेच निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शाळा आणि महाविद्यालयातून विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असे ते म्हणाले.

जागतिक बुद्धीबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने मनोगत व्यक्त केले. बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती होण्यासाठी राज्य शासनाचे मोलाचे सहकार्य मिळाले. नागपूर हे शहर माझ्यासाठी विशेष आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी नागपूरकरांचे आभार मानते. या यशानंतर पुढील जागतिक स्पर्धांसाठी आणखी जोमाने तयारी करणार असल्याचे तिने सांगितले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार डॉ. परिणय फुके यांनीही आपले विचार व्यक्त केले. भारतात आयोजित होणाऱ्या चेस वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech